Sharad Pawar | ‘वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी’; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : Sharad Pawar | ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना एक खळबळजनक विधान केले आहे. दिल्लीत आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’त बोलताना त्यांनी वारकरी चळवळीत शिरकाव करत असलेल्या प्रतिगामी विचारसरणीबद्दल धोक्याचा इशारा दिला. संत परंपरेने देशाला समता आणि मानवतेची शिकवण दिली, मात्र आता त्याच चळवळीत धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले की, वारकरी संप्रदायाचा मूळ पाया हा ‘भेदाभेद’ गाडण्याचा आणि सर्वांना सामावून घेण्याचा राहिला आहे. संतांनी आपल्या साहित्यातून नेहमीच पुरोगामी आणि सुधारणावादी विचार मांडले. परंतु, अलीकडच्या काळात या संप्रदायामध्ये अशा काही लोकांची घुसखोरी झाली आहे, जे प्रतिगामी विचारसरणीचा पुरस्कार करत आहेत. हे लोक धर्मांध शक्तींना खतपाणी घालणारी मांडणी करून मूळ वारकरी चळवळीची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती पवारांनी व्यक्त केली.
या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत केंद्रीय मंत्री असताना महिलांसाठी वेगळे धोरण आखण्याची गरज तुम्हाला का भासली, यावरही शरद पवार यांनी भाष्य केले. माझ्यावर काही व्यक्तींचा अत्यंत प्रभाव आहे. त्यातील एक म्हणजे माझी आई. त्याकाळी जिल्हा लोक बोर्डात महिला प्रतिनिधीसाठी एक जागा असायची. त्या जागेवरुन संपूर्ण जिल्ह्यातून माझी आई निवडून आली होती. तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती एकही बैठक चुकवायची नाही. अभ्यास करुन जायची. त्याकाळी प्रवासाची साधने नसायची. खासगी मोटर सर्व्हिस होती, एसटी नसायची, असे शरद पवार म्हणाले.
