Ajit Pawar Plane Crash | घातपातासह गुन्हेगारी कृत्य अजित पवार विमान अपघातप्रकरणात आहे का? या दिशेने सीआयडीचा तपास सुरु; अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
पुणे : Ajit Pawar Plane Crash | बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात अकस्मात मृत्यु प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. या अपघातामागे घातपात आहे का रॅश निगलिजन्स आहे का आणि गुन्हेगारी कृत्य घडले आहे का या दिशेने तपास करत असून सीआयडीने भरपूर पुरावे गोळा केल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार यांनी बारामती पोलीस ठाण्यात विमान कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गुरुवारी सीआयडीने पत्रकार परिषदेत तपासाबाबत माहिती दिली.
सुनील रामानंद यांनी सांगितले की, बारामती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युचा नोंद करण्यात आली आहे. राज्य शासनाने त्याचा तपास सीआयडीकडे सोपविला आहे. पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक व त्यांचे पथक याचा तपास करीत आहेत. या अपघाताच्या तपासासाठी ३ उद्देश आहेत़ या प्रकरणात घातपात आहे का?. रॅश नेगलिजन्स आहे का? यात गुन्हेगारी कृत्य घडले आहे का? या तीन मुद्द्यावर सीआयडी तपास करीत आहेत.
याचा तपास योग्य दिशेने, वेगाने आणि व्यावसायिक पद्धतीने करण्यात येत आहे. बारामती मेडिकल कॉलेज, फॉरेन्सीक महाविद्यालय तसेच फॉरेन्सिक लॅब यांची तपासामध्ये मदत घेतली जात आहे. त्याचबरोबर केंद्रातील अन्य संस्थांची मदत घेतली जात आहे.
एअरक्रॉफ्ट इन्व्हेस्टिीगेशन ब्युरोही याचा तपास करत आहे. त्यांचा तपास संपल्यानंतर त्यांच्या अहवालाचा निष्कर्ष लक्षात घेण्यात येऊन त्याचा समावेश सीआयडीच्या तपासात करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने हा तपास सीबीआयने करावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. या अपघाताचा तपास समाधानकारक सुरु आहे. यात घातपात किंवा गुन्हेगारी कृत्य असल्याचे निष्पन्न झाल्यास योग्य त्या कलमाखाली गुन्हा दाखल करु. न्यायालयात अभियोग दाखल करण्यात येईल, असे सुनिल रामानंद यांनी सांगितले.
सीआयडीने भरपूर पुरावे गोळा केले आहेत. अनेक पुरावे, डेटा समोर आला आहे. अनेक तज्ञ लोकांचा टेक्निकल रिपोर्ट घेतला जात आहे. हा तपास कधी पूर्ण होईल, हे सांगता येत नसल्याचे सुनिल रामानंद यांनी सांगितले.
एअरक्रॉफ्ट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा रिपोर्ट आल्यानंतर त्यात ज्या दिवशी घातपात अथवा गुन्हेगारी कृत्य असल्याचा निष्कर्ष निघेल, त्यादिवशी पुढील कारवाई केली जाईल, असे रामानंद यांनी सांगितले.
