Ajit Pawar | 44 वर्षाच्या झंझावती कारकिर्दीची अकाली एक्झिट ! वेळेचे महत्व राजकारण्यांना पटवून देणार्‍या नेत्याला महाराष्ट्र मुकला

Ajit Pawar (1)

पुणे : Ajit Pawar | गेली ४४ वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात आपला स्वत:चा ठसा उमटविणारे नेतृत्व, राजकारण्यांना वेळेचे महत्व पटवून देणारा नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज अपघातात दुदैवी निधन झाले.

अजित आशाताई अनंतरराव पवार यांचा प्रवरा देवळाली येथे २२ जुलै १९५९ रोजी जन्म झाला. आपले काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार यांनी १०८२ मध्ये साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवले. ते साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. पुणे जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून १९९१ मध्ये निवडून आले. पुढील १६ वर्षे ते पीडीसीसीचे अध्यक्ष होते.

१९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते. शरद पवार हे पी व्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले. तेव्हा त्यांच्यासाठी अजित पवार यांनी लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर ते शरद पवार यांच्या जागी बारामती विधानसभा मतदारसंघातून सर्वप्रथम पोटनिवडणुकीत १९९१ मध्ये विजयी झाले. त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २०१४, २०१९ आणि २०२५ अशी सतत ७ वेळा ते बारामती मतदारसंघातून निवडून गेले होते.

त्यांनी १९९१ ते १९९२ या काळात मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम केले.

१९९२ मध्ये जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते मृद संधारण, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री झाले. १९९९ मध्ये, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात, ते पाटबंधारे विभागाचे कॅबिनेट मंत्री झाले. २००३ मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना अतिरिक्तपणे ग्रामविकास विभागाची जबाबदारी देण्यात आली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने विजय मिळवल्यानंतर, त्यांनी देशमुख आणि नंतर अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्रालय कायम ठेवले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात असताना सप्टेंबर २०१२ मध्ये प्रशासकीय अधिकारी विजय पांढरे यांनी जलसंपदा विभागात ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. पाठोपाठ पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करुनही राज्यातील सिंचन क्षमता १ टक्क्यांनीही वाढली नसल्याचे सांगितले. तेव्हापासून अजित पवार यांच्यामागे ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप लावला.

त्यातून त्यांची राजकीय कारकिर्द काळवटुंन गेली ती शेवटपर्यंत. २०१९ मध्ये त्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून भाजपबरोबर युती करुन पहाटेचा शपथविधी केला. पण, त्यांचे बंड दोन दिवसही टिकले नाही. ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना पाठिंबा देणार्‍या आमदारांची संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे नंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले. कारोना काळात त्यांनी आपल्या कर्तबगारीने राज्याला आर्थिक संकटातून वर काढले. त्यानंतर २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर ते विरोधी पक्ष नेते झाले. त्यानंतर २०२३ मध्ये त्यांनी शरद पवार यांना सोडून भाजपबरोबर युती केली. त्यातून ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी त्यांनी राज्यभर फिरुन जोरदार प्रचार केला. त्यातून आपल्या एकट्याच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० हून अधिक आमदार निवडून आणले.

पहाटे लवकर उठून कामाला सुरुवात करणे, त्यांनी स्वत:बरोबरच शासकीय अधिकारी, कार्यकर्त्यांना सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय लावली. त्यांच्या कामाचा झपाटा विलक्षण होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न पाहिले. पण, संख्याबळामुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहिले. पण, आतापर्यंत ते शक्य झाले नव्हते. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे ते कधीही शक्य होणार नाही.

You may have missed