Bajirao Raod Pune News | पुणे : सोमवारी मध्यवर्ती बाजार पेठ बंद असतानाही बाजीराव रस्ता दोन्ही बाजूला डबल पार्किंगमुळे ‘कोंडीत’

No Parking

पुणे : Bajirao Raod Pune News | सोमवारी मध्यवर्ती बाजार पेठ बंद असताना बाजीराव रस्त्यावर नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूला अगदी दुचाकीपासून चार चाकी वाहने सर्रास पार्क केलेल्या होत्या. एवढेच नव्हे तर नूमवि शाळेसमोरील दुकानांच्या पुढे डबल पार्कींग करून मोटारी उभ्या करण्यात आल्या होत्या. यामुळे सार्वजनिक सुट्टी असतानाही बाजीराव रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे दिसून आले.

शहराच्या मध्यवर्ती शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी स्थानीक कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांनी हे दोन्ही रस्त्यांच्या खालुन अनुक्रमे स्वारगेट आणि सारसबागेपर्यंत भुयारी मार्ग तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या मागणीवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उच्चस्तरीय अधिकार्‍यांची बैठक बोलविण्याचे आश्‍वासन देत या मार्गाचा आराखडा तयार करण्यासाठी हिरवा कंदीलही दाखविल्याचे रासने यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

  हजारो कोटी रुपये खर्चाची आणि अनेक तांत्रिक अडचणी असलेली भुयारी मार्गाची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणायची झाल्यास दीर्घ कालावधी लागणार आहे. तोपर्यंत आहे त्या रस्त्यांवरील अतिक्रमणे, बेकायदा पार्किंगचे नियोजन करून वाहतूक गती करण्यासाठी प्राथमिकता द्यावी लागणार आहे. या रस्त्यांवर अतिक्रमणे आणि बेकायदा पार्किंग करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे देखिल रासने यांनी जाहीर केले आहे. परंतू या घोषणांवर कार्यवाहीसाठी अद्याप कुठलेही पाउल उचलल्याचे आजच्या या रस्त्यावरील स्थितीतून दिसून आले.

  सोमवारी शहरातील तुळशीबागेसह मध्यवर्ती बाजार पेठ बंद असते. तसेच शाळांनाही सुट्टया लागल्या आहेत. त्यामुळे येथील रस्त्यांवर रोजपेक्षा वाहतूक कमीच होती. विशेषत: बाजीराव रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण कमी होते. मात्र, अगदी टेलिफोन एक्सचेंजपासून अगदी शनिवार वाड्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केल्याचे दिसून आले. या रस्त्यावर अगदी अत्रेे सभागृहापासून शनिवारवाड्यापर्यंत दोन्ही बाजूला फक्त व्यापारी आस्थापना आहेत. त्यामुळे ग्राहकांसोबतच व्यावसायीकांची वाहने रस्त्यांवर असतात. यामध्ये अगदी दुचाकींपासून मोटारी आणि मालवाहतूक करणार्‍या टेम्पोंचाही समावेश आहे. पैकी ठराविक ठिकाणीच नो पार्किंग तसेच सम विषम पार्कींग करण्यात आले आहे. त्यामुळे देखिल बिनधास्तपणे गाड्या उभ्या केल्या जातात.

  पूर्वी वाहतुकीसाठी दुहेरी असलेला शिवाजी आणि बाजीराव रस्ता साधारण दोन दशकांपुर्वी एकेरी करण्यात आले आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हे दोन्ही रस्ते आता कायमच कोंडीत अडकलेले असतात. मात्र, या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी हे रस्ते ज्याठिकाणी अरुंद आहेत तेथे नो पार्किंग करणे, सम विषम पार्किंग करणे, येथील पदपथ बॅरीकेडींग करून फक्त पादचार्‍यांसाठी उपलब्ध करून देणे, या रस्त्यांना जोडणार्‍या अंतर्गत गल्ल्यांतील रस्ते एकेरी करणे, या जोड रस्त्यांवर निर्माण होणार्‍या चौकातील सर्वच रस्त्यांवर चौकांपासून पन्नास मीटरपर्यंत नो पार्किंग झोन करणे अशी कुठलिही उपाययोजना वाहतूक पोलिसांनी केलेली नाही. तसेच आतापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीने सार्वजनिक हित पाहून त्यावर उपाययोजना सुचविण्यास पुढाकार घेतला नाही. त्यामुळे यामागे काही ‘आर्थिक’ गणिते तर नाहीत ना, असा संशय उत्पन्न होण्यास वाव आहे.

   सध्याची परिस्थिती पाहाता हजारो कोटी रुपयांचे भुयारी मार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात येईपर्यंत रोजच्या धकाधकीतून सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीत अडकून पडू लागू नये यासाठी वाहतूक पोलिस, महापालिका प्रशासन आणि स्थानीक लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

You may have missed