Baramati Plane Crash | ‘रनवे दिसू लागला की सांगतो…’ लँडिंगआधी पायलटचा शेवटचा संवाद; अपघाताआधी नेमकं काय घडलं?
बारामती/पुणे : Baramati Plane Crash | बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या घटनेचे तपशील हळूहळू समोर येत आहेत. अपघाताच्या काही मिनिटे आधी पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) यांच्यात झालेला संवाद आता उघड झाला असून, लँडिंगदरम्यान परिस्थिती सामान्य असल्याचा पायलटकडून विश्वास व्यक्त करण्यात आला होता.
प्राप्त माहितीनुसार, मुंबईहून चार्टर्ड विमानाने अजित पवार बारामतीकडे रवाना झाले होते. विमान बारामती विमानतळाच्या हद्दीत आल्यानंतर पायलटने एटीसीशी संपर्क साधला. त्या वेळी पायलटने हवामान आणि उड्डाण परिस्थितीबाबत कोणतीही गंभीर अडचण नसल्याचे सांगितले होते. मात्र, रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याची माहिती देत, “रनवे दिसू लागला की कळवतो,” असा संवाद पायलटने एटीसीला केला होता.
यानंतर काही वेळातच लँडिंगसाठी परवानगी देण्यात आली. मात्र, लँडिंग प्रक्रियेदरम्यान अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि काही क्षणांतच विमान धावपट्टीपासून काही अंतरावर कोसळून आग लागल्याचे निदर्शनास आले. अपघात इतका भीषण होता की विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू यांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि संबंधित तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली असून, पायलटचा संवाद, हवामान स्थिती, तांत्रिक बाबी आणि विमानतळावरील सुविधा यांचा सखोल अभ्यास केला जात आहे. अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार असले, तरी लँडिंगच्या क्षणी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळेच ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला असून, या अपघाताशी संबंधित प्रत्येक बाब अत्यंत गांभीर्याने तपासली जात आहे. विमान अपघाताने हवाई सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
