Chandrakant Patil | प्रभाग 9 मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर; आयुक्तांसोबत बैठक घेऊन मिसिंग लिंकच्या कामांना गती देण्याचे निर्देश
ना. पाटील यांच्या सूचनेनंतर अतिरिक्त आयुक्तांचा पाहाणी दौरा
पुणे : Chandrakant Patil | कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मधील मिसिंग लिंकबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर आले असून, सोमवारी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन, सदर कामाला गती देण्याचे निर्देश दिले. जमीन अधिग्रहण आणि इतर कामांसाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होऊनही जलदगतीने काम पूर्ण होत नसल्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली.
कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मधील मिसिंग लिंक बाबात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यात प्रामुख्याने सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पाषाण, बाणेर, बालेवाडी सर्व मिसिंग लिंकबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी अधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहणातील तांत्रिक अडचणी, अतिक्रमणे याबाबत मंत्री पाटील यांना माहिती दिली. त्यावर ना. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होऊनही सदर काम संथ गतीने होत आहे, हे अतिशय अयोग्य असल्याचे आयुक्तांना सांगितले. त्यावर आयुक्तांनी तात्काळ अतिरिक्त आयुक्तांना सदर भागातील मिसिंग लिंकबाबत पाहाणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार, मंगळवारी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि बनकर यांनी पाषाण, सुतारवाडी, बाणेर,बालेवाडी या परिसरातील मिसिंग लिंकच्या ठिकाणांची पाहाणी करुन आढावा घेतला. यावेळी मिसिंग लिंक मधील अडथळे, तांत्रिक बाबी तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी यांचा सविस्तर आढावा दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतला. तसेच, काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तत्काळ सुरू करावी, अशा स्पष्ट आणि ठोस सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
दरम्यान, सदर मिसिंग लिंक पूर्ण झाल्यास पाषाण, सुतारवाडी, बाणेर- बालेवाडी परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुलभ होणार असून, पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने वाहतूककोंडी कमी होईल. याचा थेट फायदा नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी तसेच आपत्कालीन सेवांना होणार आहे. यासोबतच परिसराचा सर्वांगीण विकास, वेळेची बचत आणि ट्राफिकमुक्त व सुरक्षित परिसर निर्माण होण्यास ही योजना महत्त्वाची ठरेल, अशी भावना यावेळी ना. पाटील यांनी व्यक्त केली.
