Hasan Mushrif | ‘जबाबदार पावले उचलणाऱ्यांना खलनायक कसे म्हणता?’; हसन मुश्रीफ यांच्याकडून तटकरे, पटेल यांची पाठराखण
कोल्हापूर : Hasan Mushrif | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेत्यांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची जोरदार बाजू मांडली आहे. काही जणांकडून त्यांना ‘खलनायक’ ठरवण्याचा प्रयत्न होत असताना, त्यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी जबाबदारीने निर्णय घेतल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
मुश्रीफ म्हणाले की, पक्षात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत अनेक कठीण निर्णय घ्यावे लागतात. संघटना टिकवणे, कार्यकर्त्यांचे संरक्षण आणि राजकीय स्थैर्य राखणे या दृष्टीने काही नेत्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे तटकरे आणि पटेल यांच्यावर वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. “जे लोक परिस्थिती सांभाळण्यासाठी पुढे आले, त्यांनाच दोष देणे चुकीचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. एका बाजूने पक्ष विभाजनासाठी काही वरिष्ठ नेत्यांना जबाबदार धरले जात आहे, तर दुसऱ्या बाजूने हे निर्णय परिस्थितीनुसार घेतले गेल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, राजकारणात प्रत्येक निर्णयामागे व्यापक राजकीय गणित आणि संघटनात्मक विचार असतो. बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींच्या आधारावर निष्कर्ष काढू नयेत.
त्यांनी पुढे सांगितले की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी नेहमी पक्षासाठी काम केले असून त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. “जे लोक वर्षानुवर्षे पक्ष उभा करतात, त्यांना एका क्षणात खलनायक ठरवणे अन्यायकारक आहे,” असे ते म्हणाले.
विलीनीकरणाच्या चर्चेवर म्हणाले…
हसन मुश्रीफ म्हणाले, विलीनीकरणाच्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्या चर्चेत फक्त अजितदादा होते, आम्ही कोणीही प्रमुख माणसे नव्हतो असा आमचा दावा आहे. जर सुनेत्रा वहिनी, कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते एकत्रीकरणाच्या मताचे असतील, तर त्यामध्ये कोणतीही अडचण येण्याचे कारण नाही. पक्ष जो निर्णय घेईल, तीच माझी भूमिका असेल. अपघाताची चौकशीबद्दल ते म्हणाले की, मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे. त्यातून जो ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला आहे, त्यातून चित्र स्पष्ट होईल. जे लोक यावर शंका उपस्थित करत आहेत, त्यांच्यासाठी चौकशी हाच एकमेव उपाय आहे.
