Kishore Belekar | चलनातले गांधी विचारात आणणे गरजेचे : किशोर बेळेकर
लातूर : Kishore Belekar | पैशाच्या आधारे चालणाऱ्या जगात मानवी मूल्यांची होत चाललेली झीज अधोरेखित करणारा प्रभावी मूक व्यंगचित्रपट ‘गांधी टॉक्स’ हा केवळ महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानापुरता मर्यादित न राहता, आजच्या समाजात ‘गांधी’ या नावाचा नेमका अर्थ काय आहे, असा विचार मांडतो, असे दिग्दर्शक किशोर पांडुरंग बेळेकर यांनी लातूर येथे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
अभिजात फिल्म सोसायटी यांच्या वतीने ‘गांधी टॉक्स’ चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपटाची संकल्पना स्पष्ट करताना बेळेकर म्हणाले की ‘गांधी’ हा शब्द दोन भिन्न अर्थांनी वापरला जातो—एक म्हणजे सत्य आणि नैतिक मूल्यांचे प्रतीक, तर दुसरा आधुनिक जीवनातील पैसा आणि सत्तेच्या वर्चस्वाचे रूपक. मूकता, प्रतीकात्मकता आणि दृश्यप्रधान कथनशैलीच्या माध्यमातून भौतिकतावादाने मानवी भावना व मूल्ये कशी झाकोळली आहेत, हे या चित्रपटात प्रभावी सामाजिक व्यंगातून मांडले आहे, भारतात पहिला चित्रपट जो बनवला गेला राजा हरिश्चंद्र तो एक मूकपट होता आणि तो एका मराठी माणसाने अर्थात दादासाहेब फाळकेंनी बनवला आणि तेव्हापासून चित्रपट निर्मितीची सुरुवात झाली, या गोष्टीला १०० वर्षे पूर्ण झाली, १०० वर्षांनंतर ही गोष्ट अभिमानाने साजरी करताना बनवण्यात येणारा चित्रपटही मूकपट असावा आणि ही भावना मनात ठेऊन हा चित्रपट विना संवादच असावा अस मी ठरवलं आणि मी त्यावर काम केल, योगायोगाने मी पण मराठीच आहे.
‘पुष्पक’ नंतर जवळपास ४० वर्षांनंतर प्रदर्शित झालेला हा मूक चित्रपट असून, त्याच्या संकल्पना आणि कथेसाठी जवळपास २५ वर्षे परिश्रम घेतल्याचे बेळेकर यांनी सांगितले. संवादांशिवाय केवळ दृश्यरचना, पार्श्वसंगीत आणि कलाकारांच्या अभिनयाच्या आधारे भावना, संघर्ष आणि विचार व्यक्त करणे हे मोठे सर्जनशील आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.
या चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांनी दिले असून, मूक चित्रपटाला भावनिक आवाज देण्याचे श्रेय त्यांनी रहमान यांना दिले. “मूक चित्रपटात संगीतच संवादाचे काम करते. ते प्रेक्षकांना कथानकातून मार्गदर्शन करते आणि प्रत्येक भावनेला अधिक प्रभावी बनवते,” असे ते म्हणाले.
सध्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होत असलेला ‘गांधी टॉक्स’ लवकरच मराठी आवृत्तीतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुभवी कलाकारांच्या प्रभावी अभिनयावर आधारित हा चित्रपट चेहऱ्यावरील भाव, देहबोली आणि पडद्यावरील उपस्थितीच्या माध्यमातून कथा सांगत प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करतो, या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती, अरविंद स्वामी, बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी, मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव, महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात आदी दिग्गज कलाकारांच्या भूमिका असून हा चित्रपट मराठीसह ५ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेला अभिजात फिल्म सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, अभिनेते सचिन दानाई, डॉ. स्वप्नील देशमुख, आदित्य कुलकर्णी, अभिषेक बुचके, प्रथमेश जाधव, श्रीनिवास कुलकर्णी, प्रा.डॉ. विश्वास शेंबेकर, डॉ दुर्गा शर्मा, शिवशंकर पटवारी यांच्यासह कला व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
