Pune PMC Elections | पुणे : 100 दिवसात 100 कामे; निकाल लागण्यापूर्वीच दोन उमेदवारांनी ठरवली विकासाची दिशा
पुणे : Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक ३ आणि ४ मधून निवडणूक लढवत असलेले सुरेंद्र आणि ऐश्वर्या पठारे यांनी निकालाची वाट न पाहता थेट कामांचा आराखडा जाहीर करत शहराच्या राजकारणात वेगळी छाप पाडली आहे. त्यांच्या ‘१०० दिवस, १०० कामे’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे ते सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमातून प्रेरणा घेत, सुशासन, शहरी समस्या आणि नागरिकांची जबाबदारी या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित हा आराखडा तयार करण्यात आला आहे. “निवडणूक जिंकणं महत्त्वाचं असलं, तरी विश्वास जिंकणं त्याहून महत्त्वाचं आहे,” असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
पहिल्या १०० दिवसांची प्राधान्यक्रम योजना
१) वॉर्ड ऑडिट व नागरिक संवाद मोहीम
वॉर्डमधील वास्तव परिस्थिती समजून घेण्यासाठी सर्वप्रथम नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात येणार आहे.
घरोघरी भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे
डिजिटल माध्यमांतून तक्रारी व सूचना संकलित करणे
वॉर्डमधील टॉप १० महत्त्वाच्या समस्या निश्चित करणे
३० दिवसांत ‘वॉर्ड स्थिती अहवाल’ (Ward Status Report) सार्वजनिक करणे
हा अहवाल नागरिकांसाठी खुला ठेवण्यात येणार असून, त्यावर आधारित पुढील कामांचा टप्प्याटप्प्याने आढावा घेतला जाणार आहे.
२) स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन मोहीम
शहरातील सर्वात मोठी समस्या असलेल्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
कचरा उचलणीचे दररोज प्रत्यक्ष निरीक्षण
कचरा साचणारे ब्लॅक स्पॉट्स आणि बेकायदेशीर कचरा टाकण्याची ठिकाणे हटवणे
सोसायट्या व झोपडपट्ट्यांमध्ये कचरा वर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी
नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती मोहिमा
३) मूलभूत सुविधा सुधारणा
दैनंदिन जीवनाशी संबंधित सुविधा तातडीने सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.
रस्त्यावरील दिव्यांची तात्काळ दुरुस्ती
फूटपाथची दुरुस्ती व पादचाऱ्यांसाठी सुरक्षितता
कचरामुक्त गल्ल्या व अंतर्गत रस्ते
स्वच्छ, सुरक्षित उद्याने आणि खेळाची मैदाने विकसित करणे
राजकारणापेक्षा प्रशासनावर भर
हा उपक्रम केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न ठेवता, कालमर्यादा, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर आधारित असल्याचा दावा सुरेंद्र आणि ऐश्वर्या पठारे करत आहेत. “प्रभागाचा कारभार म्हणजे कार्यालयात बसून फाईल्स पाहणं नव्हे, तर रस्त्यावर उतरून काम करणं,” अशी त्यांची भूमिका आहे.
निवडणुकीचा निकाल काहीही असो, पण ‘काम आधी, राजकारण नंतर’ हा संदेश देणारा हा १०० दिवसांचा आराखडा मतदारांमध्ये नक्कीच चर्चेचा विषय ठरत आहे.
