Pune Weather Update | महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला; 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 8 दिवस गारठाच

Maharashtra Weather Alert

पुणे : Pune Weather Update | मध्य प्रदेशातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. १० जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. गेल्या २४ तासांत रात्रीच्या वेळी तापमानात लक्षणीय घट झाली आहे. हवामान तज्ज्ञ सुप्रित कुमार यांच्या मते, पुढील ८ दिवस थंडी कायम राहणार आहे.

परभणी, धुळे, निफाड, अहमदनगर, जेऊर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी पुढील ३ दिवसांकरिता ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. आज पुन्हा १० जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

उत्तरेकडून भारताकडे थंड वारे वाहत आहेत. दुसरीकडे, दक्षिणेत चक्रीवादळी स्थिती निर्माण झाली आहे. तापमानात ३-५ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान स्थिर राहील. थंडीची लाट नवीन वर्षातही कायम राहील. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढील दोन दिवसांत तापमान ३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळेल. तथापि, नवीन वर्षातही थंडीच्या लाटेचा इशारा कायम राहणार आहे.  

मुंबई आणि उपनगरांसह ठाणे आणि नवी मुंबईत थंडीचा कडाका वाढला आहे. किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. राज्याच्या उर्वरित भागातही ही तीव्र थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ६ ते ९ अंश सेल्सिअस दरम्यान तापमानाची नोंद झाली आहे. वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.