Rahul Gandhi News | राहुल गांधी यांची विनंती विशेष न्यायालयाने केली मान्य ! बदनामीचा खटल्याची सुनावणी ‘समन्स ट्रायल’ म्हणून होणार

पुणे : Rahul Gandhi News | लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची लंडनमध्ये बदनामी केल्याप्रकरणी सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्याची सुनावणी ही ‘समन्स ट्रायल’ म्हणून होणार असल्याचा निर्णय येथील एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे (Judge Amol Shinde) यांनी दिला आहे. (Pune Crime Court News)
लंडनमध्ये राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले होते की, सावरकरांनी त्यांच्या एका पुस्तकात असे लिहून ठेवलेले आहे की, आम्ही मित्र एकदा जात होतो, तेव्हा कही लोक एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करीत होते, ते बघून खूप आनंद वाटत होता, परंतु, सावरकरांनी असे कुठल्याच पुस्तकात लिहून ठेवलेले नाही़ असे फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे म्हणणे आहे़ म्हणून राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली़ या बदनामीच्या खटल्याची सुनावणी आज न्यायालयात पार पडली. (Advt Milind Pawar)
राहुल गांधी यांचे वकील मिलिंद दत्तात्रय पवार यांनी राहुल गांधी यांच्या वतीने या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून घ्यावी असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता.
हा खटला काही ऐतिहासिक प्रसंगावर व घटनांवर अवलंबून आहे. विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य मिळविण्यात किती व कसे योगदान होते. विनायक दामोदर सावरकर यांनी किती पुस्तके लिहिली आहेत. विनायक दामोदर सावरकर यांचे मुस्लिमां विषयी काय विचार होते. विनायक दामोदर सावरकर यांचे ब्रिटिशां बरोबर संबंध कसे होते. अश्या अनेक ऐतिहासिक घटनांवर व संदर्भात या खटल्यात बचाव पक्षाला उलट तपास घ्यावा लागणार आहे. नैसर्गिक न्यायतत्वाला धरून व कायद्यातील तरतुदींनुसार बचाव पक्षाला खटल्याची सुनावणी व उलट तपासणी विस्तृतपणे घेण्याचा अधिकार बचाव पक्षाला आहे.
परंतु या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ म्हणून घेतल्यास बचाव पक्षाला विस्तृत व सखोल पणे साक्षीदारांचा उलटतपास घेता येणार नाही. ‘समन्स ट्रायल’ म्हणून खटल्याची सुनावणी घेतल्यास बचाव पक्षाला या खटल्यात विस्तृत व सखोल पणे बाजू मांडण्याची, वेळोवेळी आवश्यक ती कागदपत्रे दाखल करण्याची, प्रसंगी सरकारकडून मागविण्याची परवानगी मिळू शकते. म्हणून या फौजदारी खटल्यची सुनावणी ‘समन्स ट्रायल’ म्हणून या न्यायालयात व्हावी असा अर्ज अॅड़ मिलिंद पवार यांनी केला होता.
वरील अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून श्री.राहुल गांधी यांचा अर्ज व विनंती विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी मान्य केली आहे. त्यामुळे आता इथून पुढे या खटल्याची नियमित सुनावणी ‘समन्स ट्रायल’ म्हणून होईल.
फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दाखल केलेली सर्व कागदपत्र, राहुल गांधी यांनी लंडनमधील डायसापोरा या कार्यक्रमात केलेल्या भाषणाची सीडी, वर्तमानपत्र, पुस्तके, साक्षीदार यांची प्रतिज्ञापत्रे ही सर्व कागदपत्र आजतागायत बचाव पक्षाला हस्तांतरित केलेली नाहीत. सुनावणी सुरू होण्यापूर्वी बचाव पक्षाला हस्तांतरित करण्याचे आदेश न्यायालयाने फिर्यादी यांना द्यावेत असा अर्ज अॅड. मिलिंद पवार यांनी केला आहे. त्यावर फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे लेखी म्हणणे न्यायालयाने मागितले आहे. खटल्याची पुढील सुनावणी दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.