Rajya Sabha Election 2026 | राज्यसभेसाठी भाजपकडून 25 नावांची यादी दिल्लीला पाठवणार, माधव भंडारींचंही नाव पुन्हा चर्चेत
मुंबई : Rajya Sabha Election 2026 | महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईत झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीत संभाव्य उमेदवारांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सुरुवातीला मर्यादित नावांवर विचार होणार असल्याची चर्चा होती; मात्र बैठकीनंतर तब्बल २५ संभाव्य उमेदवारांची प्राथमिक यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकीत राज्यातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत विविध गट, सामाजिक प्रतिनिधित्व, प्रादेशिक समतोल आणि आगामी राजकीय समीकरणे यांचा विचार करून नावे सुचवण्यात आली. अंतिम निर्णय मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार या प्राथमिक यादीत विनोद तावडे, प्रीतम मुंडे, रामदास आठवले, माधव भंडारी, रावसाहेब दानवे, विजया रहाटकर, डॉ. भागवत कराड, भारती पवार आदी नेत्यांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जाते. ही यादी अंतिम नसून त्यातून निवडक उमेदवारांची नावे अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहेत.
महाराष्ट्रातून यंदा राज्यसभेच्या एकूण सात जागांसाठी निवडणूक होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख लवकरच आहे. त्यामुळे सर्व पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. भाजपकडून सामाजिक आणि राजकीय समतोल राखत उमेदवारांची निवड करण्यावर भर दिला जात असल्याचे पक्षांतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे.
