Sanjay Raut | कोरोनावेळी थाळ्या वाजवल्या, आता रिकामा सिलिंडर वाजवायचा का?; संजय राऊतांचा पंतप्रधानांना टोला
मुंबई : Sanjay Raut | इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. “पंतप्रधानांनी जगाला शांततेचे डोस पाजण्यापेक्षा आधी आपल्या देशातील मणिपूर आणि लडाखकडे लक्ष द्यावे,” अशा शब्दांत राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भात राऊतांचे हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
संजय राऊत म्हणाले की, युद्धाच्या दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना साक्षात्कार झाला की संसदेत जाऊन सर्वांसमोर आपल्या विचारांची देवाणघेवाण करायला पाहिजे. सर्वांना सोबत घ्यायला हवे. आम्ही इतक्या दिवसांपासून बोलत होतो की, सर्वपक्षीय बैठक घ्या. तुम्ही सर्वांना बोलवा, जे संकट जगावर आलेले आहे ते भारतात येईल. याबाबत आपण सर्वांशी बोला, सर्वांचा सल्ला घ्या. पण, पंतप्रधानांना वाटले की, जेव्हा परिस्थिती आपल्या हातातून जात आहे, तेव्हा ते संसदेत आले. कोरोनावेळी थाळ्या वाजवल्या आता रिकामा सिलिंडर वाजवायचा का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान मोदी स्वतःला ‘विश्वगुरू’ मानतात आणि रशिया-युक्रेन असो वा इराण-इस्रायल, प्रत्येक आंतरराष्ट्रीय वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आपल्याच देशातील मणिपूर गेल्या अनेक महिन्यांपासून जळत आहे, तिथे शांतता प्रस्थापित करण्यात सरकारला अपयश आले आहे. तसेच लडाखमध्ये चीनची घुसखोरी आणि तिथल्या नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असताना पंतप्रधान जगाला युद्ध थांबवण्याचा सल्ला देत आहेत, हे हास्यास्पद असल्याचे राऊत म्हणाले.
