Sandeep Khardekar | एस. एम. जोशी पुलावरील विसर्जन घाटाच्या फलकाची दुरवस्था; छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळकांची चित्रे तातडीने बदलण्याची संदीप खर्डेकर यांची मागणी
पुणे : Sandeep Khardekar | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन घाटांची रंगरंगोटी आणि सजावट करण्यात आली असली, तरी एस. एम. जोशी पुलावरील श्री यशवंत महाराज विसर्जन घाटाच्या फलकावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची चित्रे जीर्ण अवस्थेत असल्याचा मुद्दा समोर आला आहे.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी याबाबत पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
खर्डेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण पुणे शहर सजले आहे. दीड दिवसाच्या गणपतीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत होणाऱ्या विसर्जनासाठी शहरातील घाटांनाही रंगरंगोटी, फलक आणि इतर सजावटीमुळे नवा लूक देण्यात आला आहे. मात्र एस. एम. जोशी पुलाजवळील श्री यशवंत महाराज विसर्जन घाटाच्या फलकावर असलेली छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांची चित्रे खराब आणि जीर्ण अवस्थेत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
“शहरातील विसर्जन घाटांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे; मात्र या फलकावरील महापुरुषांची जीर्ण झालेली चित्रे प्रशासनाच्या निदर्शनास आलेली दिसत नाहीत. ही चित्रे तातडीने बदलण्यात यावीत,” अशी आग्रही मागणी संदीप खर्डेकर यांनी पुणे महापालिकेकडे केली आहे.
