Supriya Sule News | “मी स्वतः एसएससी बोर्डाच्या शाळेत शिकले”, CBSE बोर्डाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचा निशाणा; म्हणाल्या, “तो अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक आहेत का?”

पुणे : Supriya Sule News | केंद्र सरकारने एका बाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. तर दुसऱ्या बाजूला आता एसएससी बोर्डाला हद्दपार करून मराठी भाषेची गळचेपी सुरू केल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणल्यानतंर आम्ही त्याचे स्वागत केले होते, पण याच्या माध्यमातून आमच्या मराठी शाळांना बंद पाडत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
एका बाजूला देशात आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांची संख्या वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बोर्डांना सरकार लाल गालीचा अंथरत आहे. दुसरीकडे राज्य सरकारच्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडत आहे. याबाबत मी शिक्षण मत्री दादा भुसे यांना पत्र लिहून जाब विचारला असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” मी एक आई आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधीही आहे. मी स्वतः एसएससी बोर्डाच्या शाळेत शिकली आहे. पालकांकडे पर्याय असला पाहिजे, असे माझे मत आहे. पालकांना सीबीएसई, आयसीएसई, एसएससी असे कोणतेही बोर्ड निवडायची मुभा असली पाहिजे. एसएससी बोर्डाची काय चूक आहे?
सरकार जर सीबीएसई बोर्ड आणणार असेल तर त्यासाठी त्यांची तयारी आहे का? तुमच्याकडे तो अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक आहेत का? मागच्या आठवड्यातच राज्यातील एका शिक्षकाने आत्महत्या केली आहे. एका बाजूला शेतकरी, शिक्षक आत्महत्या करत आहेत आणि सरकारचे मात्र भलतेच काहीतरी सुरू आहे. जे आहे, त्यासाठी सरकारकडे खर्च करायला पैसे नाहीत, मग नवी टुम का काढली जात आहे?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या, सीबीएसई बोर्डाच्या शाळेत मराठी भाषेचे काय होणार? राज्याचा इतिहास शिकवला जाणार की नाही? मराठी कविता, मराठी लेखकांचे धडे या बोर्डात असणार का? आज शाळांमध्ये वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा नाहीत. शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यात सीबीएसई मध्येच का आणले जात आहे?,असे सुळे यांनी म्हंटले आहे.