Udayanraje Bhosale | “छत्रपतींबाबत कायदा करायला बजेट लागतं का?”, खासदार उदयनराजे भोसलेंचा सरकारला घरचा आहेर

पुणे : Udayanraje Bhosale | छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधाने पुढे येत असल्याने राज्यातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आता याबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. “यासंदर्भात अनेकदा मी सांगून सुद्धा कोणतेही कायदे निर्माण झालेले नाहीत. कायदा तयार करायला बजेटची गरज लागते का?”,असा सवाल उपस्थित करत उदयनराजे भोसले यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
उदयनराजे भोसले म्हणाले, ” सर्वधर्म समभाव ही भावना घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे एकत्र आणलं. लोकशाहीचा ढाचा शिवाजी महाराजांनी रचला. ज्या स्वराज्यात आपण सगळे राहत आहोत. ती स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांची होती. आपल्यातील कोणीच देव बघितला नाही. पण आमच्यासाठी शिवाजी महाराजच देव आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा वारंवार अपमान व्हावा, असे आपल्या लोकप्रतिनिधींना वाटते का? जर त्यांना तसं वाटत नसेल तर त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीने सिद्ध करून आता द्यावे”, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे.
वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरून ते पुढे म्हणाले, ‘वाघ्या कोण? वाघ्या एकच, वाघ होऊन गेला तो म्हणजे शिवाजी महाराज. तसेच त्यांनी राज्यातील अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? असा सवाल करताना मुख्यमंत्री आणि सरकार बोळ्याने दूध पितात का? अवमानबाबत त्यांना कळायला हवं, अशीही थेट टीका केली आहे.