Baramati News | महापालिका निवडणूक निकालानंतर बारामतीत अजित पवार-शरद पवार यांची गोविंदबाग येथे भेट; राजकीय चर्चांना उधाण
पुणे : Baramati News | महापालिका निवडणूक 2026 चा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते अजित पवार यांनी बारामतीतील गोविंदबाग येथे जाऊन आपले काका आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट अचानक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. अनेक ठिकाणी भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी आघाडी घेतली, तर राष्ट्रवादीला फटका बसला. या निकालानंतर पुढील राजकीय दिशा, संघटनात्मक बदल आणि आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीबाबत चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत अजित पवार आणि शरद पवार यांची ही भेट केवळ कौटुंबिक आहे की राजकीय, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत महापालिका निवडणुकांच्या निकालावर सविस्तर चर्चा झाली. पराभवाची कारणे, पक्षाची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल यावर दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याची चर्चा आहे. शरद पवार हे राज्यातील अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेते म्हणून ओळखले जातात, तर अजित पवार सध्या सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे या भेटीकडे केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
बारामती हे पवार कुटुंबाचे राजकीय केंद्र मानले जाते. त्यामुळे याच ठिकाणी झालेली ही भेट अधिक महत्त्वाची ठरत आहे. गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून दोन्ही गटांतील संबंध ताणलेले होते. मात्र या भेटीमुळे भविष्यात दोन्ही गटांमध्ये संवाद वाढेल का, पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का, याबाबत राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.
दरम्यान, या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून अधिकृतपणे कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. मात्र महापालिका निवडणुकीतील निकाल आणि त्यानंतर झालेली ही भेट लक्षात घेता, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील या भेटीकडे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा संकेत म्हणून पाहिले जात आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार हे या ठिकाणी उपस्थित आहे.
