Mohan Joshi Congress Pune | बोरघाटातील वाहतूक कोंडीत हजारो लोकांचे हाल; सरकारी यंत्रणांचे अपयश संतापजनक – माजी आमदार मोहन जोशी
पुणे : Mohan Joshi Congress Pune | टॅंकर अपघातामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटात झालेली वाहतूक कोंडी ही सरकारी यंत्रणांचे अपयश असून, हा झालेला प्रकार संतापजनक आहे, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.
एका टॅंकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात होतो आणि महामार्गावरील वाहतूक ठप्प होते. सुमारे तीस तास वाहने अडकून पडल्याने प्रवाशांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होते. सरकारी यंत्रणा ढिम्मच रहातात. अडकून पडलेल्या लोकांना पाणी आणि बिस्किटे ही मदत अतिशय उशिरा आणि तुटपुंजी मिळते आणि यावर तातडीने उपाययोजना करून मात करण्याऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची यादी देत रहातात. हा सगळा प्रकार उद्वेगजनक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
पुणे -मुंबई प्रवासाचा वेळ एक तासाचा करू, अशा घोषणा मुख्य मंत्री करत असतात. आणि दुसरीकडे एका अपघातामुळे तीस तास वाहतुकीची कोंडी होते. ही अस्वस्थ करणारी परिस्थिती असून, एवढा प्रदीर्घ काळ कोंडी राहिली याकडे सरकारने गांभीर्याने पाहिलेच नाही. या निष्काळजीपणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे .
