Navale Bridge | नवले ब्रीज अपघातप्रश्नी ‘एस्केप/रनवे रॅम्प’ची अनोखी संकल्पना – माजी उपसरपंच अक्षय इंगळे यांचा पुढाकार
पुणे : Navale Bridge | पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले ब्रीज परिसरात वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर नऱ्हे गावचे माजी उपसरपंच अक्षय सुभाष इंगळे यांनी ‘एस्केप/रनवे रॅम्प’ उभारण्याची अनोखी संकल्पना मांडली आहे.
या संदर्भात त्यांनी प्राथमिक निवेदन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पुणे महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडकर तसेच भाजप पुणे शहर सचिव रवींद्र साळेगावकर यांना दिले.
नवले ब्रीजवर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने अपघात होत असून काही दिवसांपूर्वीही गंभीर अपघात घडला होता. या मार्गावरील तीव्र उतारामुळे जड वाहनांचे ब्रेक निकामी होणे, वाहनांवरील नियंत्रण सुटणे अशा घटना वारंवार घडतात. त्यामुळे हा परिसर पुणे शहरातील अतिसंवेदनशील अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जात आहे.
या समस्येवर उपाय म्हणून ‘एस्केप किंवा रनवे रॅम्प’ ही प्रभावी सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव इंगळे यांनी मांडला आहे. ब्रेक फेल झालेल्या किंवा नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहनांना सुरक्षितपणे थांबवण्यासाठी अशा रॅम्पचा उपयोग होतो आणि मोठ्या दुर्घटना टाळता येतात, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांनी या विषयाची दखल घेत त्वरित वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे.
नवले ब्रीजवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही करण्यात येत आहे.
