Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय लवकरच; 30 जूनपूर्वी घोषणा होणार

Dattatray Bharne | Big decision on farmer loan waiver soon; Announcement will be made before June 30

मुंबई :  Dattatray Bharne | राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असून, ३० जून २०२६ पूर्वी याबाबत घोषणा केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरकार कर्जमाफीच्या विविध पर्यायांचा अभ्यास करत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री यांचे सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती सध्या राज्यातील पीककर्जाची स्थिती, थकीत कर्जाची रक्कम, शेतकऱ्यांची आर्थिक अडचण तसेच कर्जमाफीसाठी लागू शकणारे निकष यांचा सविस्तर अभ्यास करत आहे. समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या अहवालावर मंत्रिमंडळात चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शेती अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावरही भर देत आहे. हवामानाचा अचूक अंदाज, कीड-रोग नियंत्रण, सिंचन व्यवस्थापन आणि बाजारभावाची माहिती शेतकऱ्यांना वेळेवर मिळावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी धोरणावरही सरकार काम करत आहे. समितीचा अहवाल मिळाल्यानंतर सर्व बाबींचा विचार करून शेतकरी कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.