CM Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी: आगामी 5 वर्षांत वीजदरात मोठी कपात, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : CM Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. पुढील पाच वर्षांत राज्यातील वीजदरात वाढ होण्याऐवजी ते दरवर्षी १.२ टक्क्यांनी कमी होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वीजदर वाढण्याऐवजी ते कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, महावितरणने केलेल्या प्रभावी उपाययोजना आणि सौरऊर्जेवर दिलेल्या भरारमुळे हे शक्य झाले आहे. महावितरणने वीज नियामक आयोगाकडे (MERC) सादर केलेल्या याचिकेनुसार, आगामी पाच वर्षांत घरगुती वीजदरात एकूण २६ टक्के, तर औद्योगिक वीजदरात ९ टक्के कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेषतः १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ७० टक्के सामान्य ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होणार असून, पहिल्याच वर्षी त्यांच्या दरात १० टक्क्यांपर्यंत कपात होऊ शकते.
राज्यात राबवण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना २.०’ मुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे सुलभ झाले आहे. याच धर्तीवर, सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणाऱ्या उद्योगांना सौरऊर्जेच्या उपलब्धतेमुळे २५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. उद्योगांसाठी प्रति युनिट सुमारे २ रुपये १७ पैशांची बचत होणार असल्याने महाराष्ट्रातील उद्योग अधिक सक्षम होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पूर्वी वीजदरात दरवर्षी साधारण ९ टक्के वाढ गृहीत धरली जात असे. मात्र, वीज खरेदीतील तांत्रिक चुका दुरुस्त केल्यामुळे आणि भांडवली खर्चाचे योग्य नियोजन केल्यामुळे महावितरणचे सुमारे ८० हजार कोटी रुपयांचे संभाव्य नुकसान टाळण्यात सरकारला यश आले आहे. तसेच, बॅटरी स्टोरेजचे दर कमी झाल्यामुळे भविष्यात २४ तास स्वस्त वीज देणे अधिक सोपे होणार आहे.
