Pune News | दादोजी कोंडदेव व राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यांच्या पुनर्स्थापनेसाठी सकल ब्राह्मण समाजाचे महापौरांना निवेदन
पुणे : Pune News | गुरुवर्य दादोजी कोंडदेव आणि ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यांची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी भालचंद्र कुलकर्णी, विश्वजित देशपांडे, संदीप खर्डेकर, मंदार रेडे, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, मनोज तारे, तृप्ती तारे यांच्यासह समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानात नुकतेच छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचे स्वागत करताना सामाजिक सलोखा राखण्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वी हटविण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची शहरातील योग्य ठिकाणी सन्मानाने पुनर्स्थापना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, लाल महाल परिसरातून काही वर्षांपूर्वी हटविण्यात आलेला गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचा पुतळा सध्या सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात असल्याचे नमूद करत, त्याचीही पुणे शहरात योग्य आणि सन्मानजनक ठिकाणी पुनर्स्थापना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सकल ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, पुणे शहरातील सुमारे ३५ ब्राह्मण संस्था आणि संघटना या संघटनेशी संलग्न आहेत. शहरातील विविध महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त पुणे महापालिकेकडून सन्मानपूर्वक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच धर्तीवर राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव यांच्या स्मृतींचाही सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
भालचंद्र कुलकर्णी (समन्वयक), ॲड. सौ. ईशानी जोशी (सह-समन्वयक), विश्वजीत देशपांडे (प्रवक्ते), संदीप खर्डेकर (निमंत्रक) आणि समन्वय समिती सदस्य
सूर्यकांत पाठक, मंदार रेडे, चैतन्य जोशी, सुनिल पारखी, समीर गाडगीळ, विश्वनाथ भालेराव, अतुल व्यास, सौ. पद्मा जोशी, श्रीकांत जोशी, राजेंद्र कुलकर्णी, राजेश कुलकर्णी, अमित शहाणे, मनोज तारे, विजय शेकदार, मनोज पांचारिया, अजय दाते, रमेश भागवत, मयुरेश अरगडे, शामराव कुलकर्णी, विश्राम कुलकर्णी, मोहन मुंगळे, ह्रषिकेश सुमंत, सचिन वाडे-पाटील, गिरीश शेवडे, स्मिता इंदापूरकर, उदय लेले, सौ. सुजाता मवाळ, मकरंद माणकीकर, सागर मांडके, कुंदनकुमार साठे यांनी या संदर्भात महापालिकेने सकारात्मक निर्णय घेऊन दोन्ही पुतळ्यांची पुनर्स्थापना करावी, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
