Jayant Patil | ‘लाडकी बहीण योजने’तून आगामी काळात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरणार; जयंत पाटलांचा मोठा दावा
सांगली : Jayant Patil | राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गाजलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने सुरू करण्यात आलेल्या या योजनेतील तब्बल ८० लाख महिलांचे अर्ज आधीच अपात्र ठरवण्यात आले असून, आगामी काळात आणखी ५० ते ६० लाख महिलांची नावे या योजनेतून कमी केली जातील, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सांगलीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारच्या आर्थिक नियोजनावर आणि या योजनेच्या हेतूंवर कडाडून टीका केली.
जयंत पाटील यांनी सांगितले की, केवळ राजकीय फायद्यासाठी आणि मते मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी घराघरात घुसून महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले होते. मात्र, निवडणूक संपताच आता या हजारो कोटी रुपयांच्या योजनेसाठी निधी आणायचा कुठून, असा मोठा प्रश्न सरकारसमोर उभा ठाकला आहे. याच आर्थिक कोंडीमुळे आता सरकारकडून छुप्या पद्धतीने या योजनेला अटी आणि शर्तींचे निकष लावून महिलांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर महिलांचे अर्ज बाद केल्यानंतर, येत्या काही वर्षांत निकष अधिक कडक करून आणखी ५० ते ६० लाख महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना त्यांनी सरकारच्या या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला आणि “निवडणुकीपूर्वी बहिणी लाडक्या होत्या, मग आता मते मिळाल्यावर त्यांच्यावर अपात्रतेची कुऱ्हाड का चालवली जात आहे?” असा सवाल उपस्थित केला. ही योजना केवळ निवडणुकीपुरता पुळका होती की काय, अशी शंका आता निर्माण होत असल्याचे म्हणत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
